प्रमाण भाषा
प्रमाण भाषा
कु. सरोज चंदनवाले,
सप्रेम नमस्कार
कु. च्या ऐवजी "कुमारी" असे लिहायचे होते. पण नंतर लक्षात आले की सदर सदर (हाऊस ऑफ बांबू) बोली भाषेत आहे. म्हणून थांबलो. ते असो. श्रीमती यास्मिन शेख यांनी ९९ पार करून शंभरीत प्रवेश केला आहे. त्यांना माझ्यासारख्या असंख्य रसिकांच्या (मराठी भाषा प्रेमींच्या) शुभेच्छा कळवाव्यात. जीवेत शरद शतम!
आपले हे हसत खेळत लिहिलेले सदर खरंच छान असते. नक्कीच वाचले जाते.
आता ह्या वेळेचे सदर (शनिवार २२ जून २०२४). सर्वात खटकलेली गोष्ट, लेख प्रमाण भाषेत न लिहीता बोलीभाषेत लिहीला आहे.- तसे परिच्छेदात व्याकरणाची गणितासारखी भीती वाटण्याचे कारण सांगून तुम्ही स्वतःची सोडवणूक करून घेतली आहेत तरीही - हा लेख ज्यांच्यासाठी लिहिलेला आहे, त्यांच्या सन्मानार्थ तरी (श्रीमती यास्मिन शेख) हा लेख प्रमाण भाषेत असायला हवा होता. उदा:
१. या शुभ्र चांदण्यासारख्या शीतल व्यक्तिमत्त्वाचं व्याकरणासारख्या रूक्ष आणि कंटाळवाण्या क्षेत्रात काय काम? असं अनेकांना वाटायचं -- या शुभ्र चांदण्यासारख्या शीतल व्यक्तिमत्त्वाचे व्याकरणासारख्या रूक्ष आणि कंटाळवाण्या क्षेत्रात काय काम? असे अनेकांना वाटायचे...
२. मुंबईच्या शीवमधील एसआयईएस महाविद्यालयात त्यांनी २८ वर्षे शिकवलं . -- मुंबईच्या शीवमधील एसआयईएस महाविद्यालयात त्यांनी २८ वर्षे शिकविले.
३. भाषेच्या सौष्ठवासाठी हयात घालवणाऱ्या या बाईंवर आपण सगळे मिळून मराठीचं जे काही भजं करतो आहे ते बघायची वेळ आली आहे. -- भाषेच्या सौष्ठवासाठी हयात घालवणाऱ्या या बाईंवर आपण सगळे मिळून मराठीचे जे काही भजं करतो आहे ते बघायची वेळ आली आहे.
आणखीनही चार-पाच उदाहरण आहेत. पण या कांही उदाहरणावरून माझा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल, असे मी गृहीत धरतो. आम्ही वाचक हे हलकेफुलके उपहासगर्भ सदर नक्की वाचतो. ते जर प्रमाण भाषेत लिहिलेले असेल तर ते अधिक सुंदर होईल. नाटक, कविता हे साहित्य प्रकार सोडले तर बाकी सर्व मुद्रित लेखन प्रमाणभाषेतच असायला पाहिजे. बोलीभाषा बोलण्यासाठी आहे, लिहिण्यासाठी (नाटक, कविता सोडून) नाही. प्रमाण पद्धतीने लेखन केल्याशिवाय प्रमाण भाषेचे सौंदर्य लक्षातच येणार नाही. हळूहळू प्रमाणभाषा विस्मृतीत जाऊ लागेल. प्रमाण भाषा म्हणजेच अभिजात भाषा. आणि मग बोली भाषेत लिहिल्या जाणाऱ्या भाषेला अभिजाततेचा दर्जा का द्यायचा? माऊलीनी ज्ञानेश्वरी बोलीभाषेत लिहिली असती तर काय झाले असते? पण हा असा वाचकांशी जवळीख (उगीचच) दाखविण्याचा मोह भल्याभल्यांना टाळता येत नाही असे दिसते. उदा: .
१. आज रविवार (२३/६/२४) श्री. श्रीराम पवार या ख्यातनाम विश्लेषकांचा लेख बोली भाषेत म्हणजे (मात्रा कमी करून) लिहिलेला आहे. खरेतर त्यांचे लेख गंभीर विषयावर असते. त्यामुळे ते लेख प्रमाणभाषेतच लिहिले पाहिजेत.
२. प्रसिद्ध लेखक श्री राजेंद्र खेर यांनी आदरणीय कै. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या चरीत्रावर अप्रतिम कादंबरी लिहिली आहे. ती प्रकाशित होऊनही खूप वर्षे झाली आहेत. पण मी ती आता पुन्हा एकदा वाचली. हे सर्व लिखाण बोली भाषेत - जे मात्रा कमी करून- आहे. हे पुस्तक म्हणजे एक संदर्भ ग्रंथ आहे. त्यामुळे त्यात प्रवाही पण प्रमाण भाषाच असली पाहिजे.
हल्ली हे असे लिखाण आणि अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर वाढत चाललेला आहे. प्रमाणभाषा नष्ट होण्याची पहिली पायरी म्हणता येईल. वर्तमानपत्रांचे मालक आणि संपादक मिळून हा ऱ्हास थांबवू शकतात .
माझ्या सारख्यांचे हे विचार अरण्य रुदन ठरू नयेत हीच इच्छा.
जयंत करंदीकर पुणे
(ज्या चुका आढळतील त्याबद्दल क्षमस्व. अधिकृत असा मराठी - मराठी शब्दकोश उपलब्ध नाही. असल्यास कळवावे. मी विकत घेईन.)

0 Comments:
Post a Comment
<< Home